Tuesday, April 21, 2026

उन्हाळा कसा सुसह्य कराल?

उन्हाळा सुरु झाला की प्रामुख्याने दोन तक्रारी जाणवू लागतात.

एक म्हणजे सारखी तहान लागणे 

दुसरी म्हणजे भूक कमी होणे 

हवेतील उष्मा वाढला की शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्वचेवरील रंध्र उघडली जातात. घामावाटे अतिरिक्त उष्णता शरीराबाहेर टाकली जाते. त्यामुळे शरीरातील पाणी सतत कमी होत राहते आणि तहान लागल्याची भावना वारंवार होते. पण या घामा वाटे शरीरातील आवश्यक क्षार देखील बाहेर जातात त्यामुळे थकवा थकवा जाणवतो व सारखे काहीतरी द्रव पदार्थ प्यावेत अशी भावना होते.

केवळ पाणी पिऊन ही तहान भागत नाही त्यासाठी क्षार मिळतील अशा पद्धतीचे द्रव पदार्थ पिणे गरजेचे असते याच अपेक्षेने आपल्याकडे उन्हाळ्याच्या दिवसात  सरबत, पन्हं नारळ पाणी,ताक इत्यादी पिण्याची पद्धत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात नैसर्गिकपणे जास्त पाणी असणारी फळे निर्माण होतात. द्राक्ष, आंबे कलिंगड,खरबूज यासारखी फळे आवश्यक त्या पाण्याची पूर्ती करतात त्याच वेळी शरीराला त्वरित तरतरीही देतात. या सर्व फळांचे रस न काढता फळांच्या फोडी करून खाण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे तंतुमय पदार्थ देखील मिळतात.

ताक पिताना ते बाधू नये म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी घालून ते पातळ करावे व त्यात सैंधव मीठ, किंचित साखर व कोथिंबीर घालून ते दुपारच्या जेवणात प्यावे.उन्हातून घरी आल्यावर एकदम थंड पाणी न पिता गुळाचा खडा खाऊन वर पाणी प्यावे कोकम सरबत, लिंबू सरबत, कच्च्या व उकडलेल्या कैरीचे पन्हे पिऊ शकतो. 

नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक रित्या सर्व क्षार उपलब्ध असतात शिवाय ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी नारळ पाणी हा उत्तम पर्याय ठरतो फ्रीजमधील कृत्रिम रित्या थंड केलेल्या पाण्यापेक्षा माठातील नैसर्गिकपणे गार झालेले पाणी तहान अधिक चांगल्या प्रकारे भागवते. माठामध्ये मोगऱ्याची फुले वाळा असे पदार्थ टाकल्यास हे सुगंधी पाणी अधिकच कार्यकारी ठरते.

जेवणामध्ये कच्चा कांदा, कैरी, काकडी, टोमॅटो अशा प्रकारच्या शरीरात थंडावा निर्माण करणाऱ्या व जास्त पाणी असणाऱ्या भाज्या नियमित वापराव्यात.

गोड पदार्थ खायचे झाल्यास खिरींचा वापर करता येईल. तळकट पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात टाळावेत. भूक कमी लागत असल्यास दिवसातून चार-पाच वेळा थोडे थोडे खावे.